व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चांगल्याभोवती वाईटाचा गराडा

चांगल्याभोवती वाईटाचा गराडा

चांगल्याभोवती वाईटाचा गराडा

आजच्या जगात, फार कमी लोक आहेत जे इतरांसाठी त्याग करायला तयार असतात. काही जण या नाही तर त्या मार्गाने “परिस्थिती बदलवण्याचा” अर्थात इतरांचे भले करू इच्छितात. दरवर्षी, असंख्य लोक, ते समजत असलेल्या सत्कर्मासाठी कोट्यवधी रुपये देतात. उदाहरणार्थ, ब्रिटनमध्ये २००२ साली, दानधर्म म्हणून दिलेली रक्कम ५८,५०० कोटी रुपयांपर्यंत पोहंचली. सन १९९९ पासून दहा उदार लोकहितकर्त्यांनी गरजू लोकांसाठी १,७१,००० कोटीपेक्षा अधिक रूपये दिले आहेत किंवा देण्याचे वचन दिले आहे.

दानधर्म करणारे लोक अनेक सत्कार्ये करतात; जसे की ते कमी पगार असलेल्या लोकांच्या औषधांचा खर्च स्वतः उचलतात, एकट्या पालकांच्या मुलांना शिक्षण व मार्गदर्शन देण्याचा जिम्मा घेतात, विकसनशील देशांतील लसीकरण मोहिमांना निधी देतात, गरीब मुलांना त्यांचे पहिले पुस्तक देतात, गरीब देशांतील शेतकऱ्‍यांना पशुसंवर्धनासाठी पशू देतात आणि नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्यांना साहाय्य पुरवतात.

मानवांमध्ये इतरांचे चांगले करण्याची क्षमता आहे हे आता उल्लेखण्यात आलेल्या वस्तुस्थितीवरून दिसून येते. तरीपण दुःखाची गोष्ट म्हणजे, जगात असेही लोक आहेत जे इतकी क्रूर कृत्ये करतात ज्यांच्याविषयी बोलायला देखील आवडत नाही.

दुष्कृत्ये वाढतच चालली आहेत

दुसरे महायुद्ध संपल्यानंतर, जातिसंहाराच्या व राजकीय हेतूसाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची हत्या करण्याच्या जवळजवळ ५० घटनांचा अहवाल आहे. “या घटनांत कमीतकमी १.२ कोटी व २२० कोटी नागरिकांचा बळी गेला आहे; बहुतेक जण १९४५ पासून होत असलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय युद्धांत मारले गेले,” असे अमेरिकन पॉलिटिकल सायन्स रिव्ह्यू या मासिकात म्हटले आहे.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, कंबोडियात जवळजवळ २२ लाख लोकांची राजकीय हेतूसाठी कत्तल करण्यात आली. रवांडातील दोन जातींत उडालेल्या चकमकीत, ८,००,००० पेक्षा अधिक पुरुषांनी, स्त्रियांनी व मुलांनी आपला प्राण गमावला. बॉस्नियात धार्मिक व राजकीय कारणांमुळे झालेल्या कत्तलीत, २,००,००० लोक मरण पावले.

अलिकडेच घडलेल्या दुष्कृत्यांविषयी बोलताना, २००४ साली संयुक्‍त राष्ट्रसंघाचे सेक्रटरी जनरल म्हणाले: “इराकमध्ये नागरिकांची अगदी निर्दयीपणे हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत; मदतकार्य करणाऱ्‍या सेवकांना, पत्रकारांना आणि इतर नागरिकांना ओलीस धरले जाते आणि मग मानवतेला काळीमा फासणाऱ्‍या पद्धतीत ठार मारले जाते. त्याचबरोबर आपण इराकी कैद्यांना अपमानजनक वागणूक देण्यात आल्याचे पाहिले. डार्फरमध्ये आपण पाहिले, वस्तींच्या वस्ती आपली घरे सोडून पळून जात आहेत, त्यांची घरे नष्ट केली जात आहेत आणि त्याचबरोबर स्त्रियांवर बलात्कार करून मुद्दामहून कट रचला जात आहे. उत्तर युगांडात लहान मुलांचे हातपाय तोडून त्यांच्याकडून बळजबरीने सर्वात किळसवाणी कृत्ये करवून घेतली जात असल्याचे आपण पाहिले. बेस्लनमधील मुलांना ओलीस धरून त्यांची अमानूष कत्तल केलेली आपण पाहिली.”

विकसनशील म्हटल्या जाणाऱ्‍या देशांतही द्वेषामुळे दुसऱ्‍या जातीच्या लोकांविरुद्ध केले जाणारे गुन्हे देखील वाढतच चालले आहेत. उदाहरणार्थ, २००४ मध्ये, ब्रिटनने “गेल्या दशकात वेगळ्या जातीच्या लोकांवर झालेल्या हल्ल्यांचे किंवा शोषणाचे प्रमाण अकरा टक्क्यांनी वाढल्याचे” पाहिले आहे, असा इंडिपेंडंट न्यूजने अहवाल दिला.

मानवांमध्ये इतरांचे चांगले करण्याची क्षमता असताना ते इतकी वाईट कामे किंवा दुष्कृत्ये का करतात? दुष्कृत्यांपासून आपली कधी सुटका होईल का? या पेचांत पाडणाऱ्‍या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे बायबलमध्ये देण्यात आली आहेत, हे पुढील लेखात दाखवण्यात आले आहे. (w०६ १/१)

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

COVER: Mark Edwards/Still Pictures/Peter Arnold, Inc.